Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचे सुत्र ठरले, BJP – Shiv Sena दोन अंकी जागा लढविणार तर NCP एक अंकी जागा लढवणार – सूत्र
BJP NCP Shiv Sena Seat Sharing : लोकसभा निवडणूक येत्या आठवडाभरात घोषित होण्याची शक्यता आहे. त्या आधी देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) जागावाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) महायुतीचे जागा वाटप कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महायुतीत जागावाटपावरून बरेच घमासान सुरु आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. अश्यातच महायुतीचे जागा वाटप (Mahayuti) निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. (Mahayuti Seat Sharing)

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी रात्री दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील 48 जागांवर सखोल चर्चा करण्यात आली. महायुतीचे कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात यावरही या बैठकीत खल करण्यात आला. त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोणते मतदारसंघ सोडायचे यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार असा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघापैकी 31 लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रिंगणात असतील. महायुतीचे घटक पक्ष शिवसेना 13 मतदारसंघात तर राष्ट्रवादी 4 मतदारसंघात आपले उमेदवार उभे करून या निवडणुकीला सामोरे जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांच्या बैठकीत मांडली होती. त्याच बरोबर त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या 13 लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला.
भाजपने शिवसेनेला राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघ देताना त्यात एका जागेचा बदल केला आहे तर एका मतदारसंघात उमेदवाराचा बदल केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ भाजपने घेतला आहे. तर त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ दिला आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मंतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या ऐवजी समरजीत घाटगे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवतील. दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला राज्यातील ४ लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार आहे.
बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे गजानन किर्तीकर आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे विधान परिषदेवर राजकीय पुर्नवसन करण्यात येणार आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघातील प्रत्येक उमेदवारावर काल भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झालीय. आता तीनही पक्षांचे जागावाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचीही माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर 370 तर NDA म्हणून 400 पार जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. याचाच भाग म्हणून भाजप देशभरात सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे करत आहे. महाराष्ट्रातील 48 जागा भाजपसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. 48 पैकी 25 ते 30 जागा भाजप स्वबळावर जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्रात मिशन 45 ची घोषणा महायुतीने केली. भाजपने महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात जोरदार तयारी हाती घेतली आहे.