Ram Shinde | विधानपरिषदेचं तिकीटं कसं मिळालं ? जाणून घ्या राम शिंदे यांच्याच शब्दांत संपूर्ण किस्सा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्याचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची नुकतीच विधानपरिषद सदस्यपदी (MLC) निवड झाली.अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या (BJP) सर्व आघाड्यांच्या वतीने आमदार राम शिंदे यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विधानपरिषदेचं तिकीट कसं मिळालं ? राज्यसभेची लाॅटरी कशी हुकली ? याबाबतचा किस्सा स्वता: राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितला.
आमदार राम शिंदे यांच्याच शब्दांत विधानपरिषद निवडणुकीचा किस्सा जाणून घेऊयात..
विधानपरिषदेवर मला संधी द्यावी, असा ठराव जिल्हा भाजपने एकमताने केला, तो प्रदेशला पाठवला आणि तिथेच चांगली सुरुवात झाली. जिल्ह्यातून पक्षाकडे ठराव गेल्यानंतर मी पक्षाकडे गेलो, पक्षाकडे विधानपरिषदेची मागणी केली. राज्याच्या नेतृत्वाकडे बोलत असताना मी म्हटलं विधानपरिषदेचा ठराव झालाय, समोरून प्रस्ताव आला निवडणूका राज्यसभेच्या लागल्यात.
मग मी जिल्ह्याच्या ठरावाप्रमाणे मागणी केली, पाच ते दहा मिनिटाची चर्चा केली आणि मी उठून आलो. कारण माझा इंट्रेस्ट विधानपरिषदेत होता. द्यायचयं तर विधानपरिषद द्या, राज्यसभा कशासाठी, पण ते म्हणले निवडणूकचं लागली नाही विधानपरिषदेची तर आता त्याच्यावर चर्चा कशी होईल.
परत आलो, परत चार दिवसांनी गेलो, चार दिवसांत बरचं डोक्यात वातावरण फिरलं, जे हाय ते पदरात पाडून घ्या म्हणलं, हे नको नं ते नको म्हणायची ती ही वेळ नाहीये, मी पुन्हा एकदा गेलो, पुन्हा सांगितलं, म्हणलं आपण जसं म्हणता तसा मी तयार आहे. मी म्हणलं राज्यसभा बी चालेल, परिस्थिती बिकट होती, जे पदरात पडेल ते घ्या अश्या वातावरणात म्हटलं चालेल.
जेव्हा 28 तारीख आली आणि माझ्या लक्षात आलं माझा सगळा फाॅर्म भरून घेतलाय, सगळं प्रतिज्ञापत्र तयारय, नोटरीपुढं साईन झाली आणि 28 तारखेला दुपारी कळालं आता जरा अवघडयं, आता फाॅर्म भरल्यावर अवघड झालयं म्हणल्यावर चांगले मोठे इंडीकेटर लागले.जवळ आलेलं गणित बिघडतं की काय ? कर्डिले साहेबांनी मांडलेला ठराव जातो की काय ? विधानपरिषदेचा ठराव सोडून हा राज्यसभेचा ठराव होता.
पण लगेच तात्काळ जिथे कुठे संपर्क साधायचा तिथे मी केला, संपर्क केल्याबरोबर म्हटले असं झालयं, तु बी जरा नाराज होता, राज्यसभा नको होतं आणि म्हणून मग आता बघू पुढं काय होईल ते, पण 28 तारखेला विधानपरिषदेचा शब्द पक्का झाला. राज्यसभेचा फाॅर्म विड्राॅल झाला आणि विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली.
विधानपरिषदेला उमेदवारी मिळाली आणि कर्जत जामखेडमधील कार्यकर्त्यांनी एवढा जल्लोष केला, फाॅर्म भरायला बी तिथं गर्दी तेवढीच, विधानभवनात कर्जत जामखेड आणि नगरची माणसं, निवडून आल्यानंतर देखील तेवढेच, आणि इथं मिरवणूकीला आल्यावर देखील तेवढेच. 2019 मध्ये जी मिरवणूक काढायची होती ती आता 2022 ला तेवढी मिरवणूक काढली, 2019 ला जो अपघात झाला, त्याच्यात जो पराजय झाला त्याचं उट्ट काढण्याचं काम झालं.
भाजपच्या केंद्रीय, राज्य आणि जिल्ह्याच्या नेतृत्वाने जो एकमुखी,एकसंध काम करण्याची संधी मला प्राप्त करून दिलेली आहे, ती निश्चित स्वरूपामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी मी उपयोग करणार आहे असा शब्द यावेळी राम शिंदे यांनी दिला.
गेल्या अडीच तीन वर्षात कर्जत जामखेड मधले कार्यकर्ते सैरभैर झाले होते, जिल्ह्यामध्ये सुध्दा यापेक्षा वेगळं वातावरण नव्हतं, पण जसं विखे पाटील साहेबांनी सांगितलं आपण सगळे इथे डबल डोसमुळे बसलोय, मोदीजींमुळे बसलोय, तो पहिला डोस होता राज्यसभेचा, दुसरा डोस बसला विधानपरिषदेचा, आता आपण तिसऱ्या डोसच्या तयारीत आहोत आणि तो बुस्टरडोस आहे. राज्यात आपलं सरकार येणार आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातून कोणी सोडून जाणार नाही.
20 तारखेला आपल्या जिल्ह्यातून दोन जिल्हा परिषद सदस्यांंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तोंड झोडून घेत असतील ते आता असे म्हणत पक्षांतर करणारांचा शिंदे यांनी समाचार घेतला.
राज्यात आपलं सरकार येणार आहे, केंद्रात आपलं सरकार आहे, आठ वर्षांत सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं, राज्यात किंवा देशात जेव्हा केव्हा पोटनिवडणुका होतात तेव्हा भाजप जिंकून येते. अगामी काळात अहमदनगर जिल्ह्यात वेगळं वातावरण राहणार नाही, जिल्ह्यातील सर्व निवडणूका जिंकायच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे अवाहन आमदार राम शिंदे यांनी केले.